दिनविशेष - रे मना!
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:41 PM (IST)
समर्थ रामदासांनी आपल्या "मनाचे श्लोक'मध्ये मनाविषयी अतिशय सूक्ष्म विचार केला आहे. या मनालाच ते सांगतात, उपदेश करतात.
या मनाला आवर घालणे अतिशय कठीण आहे हे सांगताना ते म्हणतात, ""अचपळ मन माझे नावरे आवरिता.'' खरोखर या मनाला आपल्या काबूत ठेवणे महाकठीण. या अस्थिर मनाला जर आपण आवर घालू शकलो तरच ईश्वरापाशी आपण एकरूप होऊ आणि हा भवसागर पार करू. हा मुक्तीचा मार्ग मोठा सुखदायी असतो. असे हे मन अतिसामर्थ्यवान आणि स्वच्छंदीही असते. तसेच हे मन हट्टी आणि दुराग्रहीही असते. म्हणूनच मनाची तुलना घोड्यांशी आणि माकडाशीही केली जाते.
घोड्याला थोडी जर मोकळीक मिळाली तरी तो सैरावैरा धावत सुटतो. अशावेळी त्याला लगामाच्या साहाय्याने नियंत्रणात ठेवावे लागते. तीच अवस्था मनाची! सतत या मनाला सुद्धा कधीही स्वस्थ बसवत नाही. तसेच या मनाचे आहे. माकड सतत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत असते. काही ना काही खात तरी असते. तसेच आपल्या मनाचे आहे. आपले मनही क्षणाक्षणाला विचार बदलत असते. आता हा विचार, तर दुसऱ्याच क्षणाला दुसरा विचार. अतिशय चंचल अशा या मनाला नियंत्रणात ठेवायचे म्हणजे नियमित साधना ही हवीच.
हत्तीला अंकुशाने ताब्यात ठेवता येते. घोड्याला लगामाने नियंत्रणात ठेवता येते. मात्र या चंचल, दुराग्रही, हट्टी, सामर्थ्यवान मनाला सततच्या साधनेने आणि आध्यात्मिक विचाराने नियंत्रणात ठेवता येते. वास्तविक मानवास बंधनात ठेवण्यास अथवा बंधमुक्त करण्यास मनच कारणीभूत असते. विकारी माणूस बंधनात पडतो, तर विषयासक्त नसलेला माणूस बंधनमुक्त असतो. मानवाची प्रगती आणि अधोगती याला मनच कारणीभूत असते हेच खरे!
म्हणूनच सततच्या कठोर साधनेने आणि कडक अनुशासनाद्वारेच मनाला आपण काबूत ठेवू शकतो हे आपण जाणले पाहिजे.